Ticker

6/recent/ticker-posts

पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा प्रशासनाचे आवाहन

> पीएम किसान योजनेची वार्षिक ई-केवायसी ३० जूनपूर्वी पूर्ण करा                                          प्रशासनाचे आवाहन
             अकोला, दि. २९ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
             योजनेमध्ये पारदर्शकता आणणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थींपर्यंतच शासनाचे अर्थसाहाय्य पोहचवणे हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यभरात २० मे २०२६ पासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, गावपातळीवर याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.

            सध्या वार्षिक ई-केवायसी मोहीम राबवली जात आहे. ३० जून ही या प्रक्रियेची अंतिम मुदत असून, विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आगामी हप्ते तांत्रिक कारणास्तव थांबवले जाऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी (पीएम किसान) तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे यांनी केले.
*दोन सोप्या पद्धतीने करा प्रमाणीकरण*
`बायोमॅट्रिक पद्धत :` शेतकरी आपल्या जवळच्या सामूहिक सुविधा केंद्रावर जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन ई-केवायसी करू शकतात.
`फेस ऑथेंटिकेशन :` पीएम किसान मोबाइल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
*दिव्यांग व वृद्ध शेतकऱ्यांसाठी घरपोच सुविधा*
ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना शारीरिक हालचालींमुळे केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी शासनाने विशेष सोय केली आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी अशा लाभार्थींच्या घरी जाऊन ‘फेस ऑथेंटिकेशन’द्वारे त्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत. 
*ॲग्रीस्टॅक योजनेचे तालुकानिहाय प्रलंबित लाभार्थी*
अकोला ३१४३, अकोट ३१५५, बाळापूर ३०२०, बार्शीटाकळी ३१०८,  मुर्तीजापुर २६५८, पातुर २३५८ व तेल्हारा २३५८ खातेदार ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यापासून शिल्लक आहेत. पी एम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे ज्या लाभार्थ्यांचे प्रलंबित आहे अशा लाभार्थ्यांचे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढल्यानंतर केंद्र शासनाकडून आपोआप Land Seeding – Yes होते. त्यामुळे लाभार्थींना पुन्हा भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करण्याची कार्यवही करावी लागत नाही. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अकोला वर्षा मीना यांनी केले आहे. 
००

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ